सांगली : ‘सैन्याला केवळ विजयच ठाऊक असतो. पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील. शुक्रवारी दिवसभरात पाच हजार लोकांना अवघड ठिकाणांहून बाहेर काढण्यात आले आहे,’ अशी माहिती जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार यांनी दिली.
जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार म्हणाले, ‘एवढी मोठी आपत्ती येईल याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये स्थिती गंभीर झाल्याने पूरात अडकलेल्या लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिल्ली येथे उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन अत्यंत गतीने मदतकार्यासाठी सुत्रे हलवण्यात आली. सांगली येथील परिस्थिती जास्त गंभीर असल्याने अन्य ठिकाणी न जाता येथे रातोरात दोन हेलिकॉप्टर मागविण्यात आली. त्याव्दारे हरिपूर, सांगलीवाडी परिसरातील पुरात अडकलेल्यांना मदत साहित्य पोहोचविण्यात आले आहे. गाव भागात बोटीव्दारे मदत पोहोचविण्यात येत आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘संकटाच्या वेळेत एकमेकांना धीर देऊन मदत करण्याची गरज आहे. लवकरच सदर्न कमांडचे कमांडर पाहणी करण्यासाठी येणार आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.